प्रेमविवाहानंतर सुखी संसार पाहिजे असल्यास कधीच या चूका करु नका ! होऊ शकते उध्वस्त…

प्रेमविवाहानंतर सुखी संसार पाहिजे असल्यास कधीच या चूका करु नका ! होऊ शकते उध्वस्त…

आजच्या युगात स्वत:च आपला जोडीदार शोधून लग्न करण्याची प्रथा सुरु झाली आहे आणि ठरवून लग्न करण्याची प्रथा मागे पडत चालली आहे. पण एका अर्थाने ते चांगलं सुद्धा आहेच कारण जर जोडीदार ओळखीचा असेल तर त्याच्या सोबत संसार करणं सोप्पं जातं. शिवाय आपल्याला हवा असलेला व्यक्ती निवडण्याचं स्वातंत्र्य सुद्धा मिळतं.

असा कोणी व्यक्ती मिळाला तर प्रथम प्रेमाचे दिवस सुरु होतात. थोडा काळ लोटला, विश्वासाचे नाते निर्माण झाले की मग लग्नाच्या गाठी जुळतात. पण लग्न झाल्यावर अशा काही गोष्टी आहेत ज्यांची काळजी दोन्ही उभयंतांनी घ्यायला हवी. नाहीतर हसतं खेळतं नातं बिघडण्यास आणि मी हे लग्न का केलं असा पश्चाताप वाटण्यास वेळ लागणार नाही.

प्रत्येक प्रेम विवाह करणाऱ्या व्यक्तीला आशा असते की आपण आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत सहज सुखाने आयुष्यभर संसार करू. पण अशी अनेक उदाहरणे तुम्ही सुद्धा पाहिली असतील ज्यांचे एकमेकांवर खूप प्रेम असते पण लग्न झाल्यावर काहीच काळात ते विभक्त होतात किंवा त्यांच्यात लग्नाआधी सारखे प्रेम टिकत नाही. चला आज जाणून घेऊया की असे होऊ नये म्हणून कोणत्या गोष्टी टाळाव्यात.

पती पत्नीचे नाते – लग्न झाल्यावर दोघांनी सुद्धा हे लक्षात घेतले पाहिजे की आता आपण बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड राहिलेले नसून पती पत्नी झालो आहोत. सामाजिकदृष्ट्या मान्य असलेले हे नाते टिकवायचे असेल तर तुम्हाला अजून थोडे मॅच्युर व्हावे लागते. पण हा मॅच्युर पाळताना लग्नाआधीचे प्रेम सुद्धा सांभाळावे लागते. सतत होणारी भांडणे, रुसवे फुगवे हे पूर्वी सारखेच हाताळावे लागतात. जर त्यात खंड पडला तर नात्याला धक्का पोहोचायला वेळ लागणार नाही.

बदल गरजेचा आहे – मी अशीच आहे आणि अशीच राहणार किंवा मी असाच आहे आणि असाच राहणार ही वृत्ती व हट्ट दोघांनी बदलणे गरजेचे आहे. लग्नानंतर अनेक गोष्टी बदलतात, परिस्थिती बदलते आणि त्यानुसार स्वत:मध्ये बदल घडवून आणणे आणि सुखी संसारासाठी शक्य तितके जुळवून घेणे गरजेचे आहे.

ज्या कपलला हे जमले त्यांचा संसार कधीच वाईट होत नाही. पण जे आपला स्वभाव बदलायला तयार नसतात आणि कोणत्याही गोष्टीशी जुळवून घ्यायला तयार नसतात त्यांची मात्र पंचायत होऊ लागते आणि त्याचे भयंकर परिणाम नात्यावर होऊ शकतात.

गृहीत धरू नका – लग्नानंतर एक चुकी अनेकांकडून होते की ते आपल्या जोडीदाराला गृहीत धरू लागतात. आपलं आपल्या जोडीदारावर प्रेम आहे आणि त्याला ते माहित आहे मग सारखं सारखं ते का व्यक्त करावं ही वृत्ती जोडीदाराला तुमच्या पासून दूर नेऊ शकते. या वृत्तीमुळे नात्यात ती ओढ राहत नाही, माया राहत नाही.

साहजिकच जे प्रेम लग्नाआधी होतं ते हळूहळू कमी होत जातं आणि एक काळ असा येतो जेव्हा या नात्यात काही उरलं आहे की नाही असा प्रश्न मनात डोकावू लागतो. म्हणून शक्य तितकी नात्यातील ओढ कायम ठेवण्याचा प्रयत्न करा.

संशय कमी करा – लग्नानंतर अनेकदा नाते तुटण्याचे कारण हे संशय असते. या काळात अचानक संशयाला वाव निर्माण होतो. कधी स्त्री तर कधी पुरुष आपल्या जोडीदाराबद्दल संशय व्यक्त करतो. जर संशय असेल तर तो सिद्ध करणारा ठोस पुरावा जमवून जोडीदाराला जाब विचारायला हवा. पण वारंवार उगाच तुम्हाला वाटतं म्हणून जोडीदारावर संशय घेणे त्याला तुमच्यापासून दूर घेऊन जाऊ शकतं.

प्रेम आहे म्हणून एका मर्यादेपर्यंत तुमचा जोडीदार सहन करू शकतो. पण सततचा संशय वाढतच राहिला तर मात्र नातं तुटण्याची देखील भीती असते. त्यामुळे शक्य तितके सकारात्मक राहून जसे लग्ना आधी आपल्या जोडीदारावर प्रेम करायचा तसे प्रेम करा.

Team Marathi Tarka