लग्नाआधी होणाऱ्या बायकोला कधीच विचारू नका ‘त्याबाबत’ प्रश्न !

लग्न म्हटलं की मुलाकडून मुलीची आणि मुलींकडून मुलाची चौकशी होते आणि ती झालीच पाहिजे. कारण आपण ज्या घरासोबत नातं जोडतोय आणि आपल्या मुलासाठी व मुलीसाठी ज्या व्यक्तीची जोडीदार म्हणून निवड करतो आहे ती नेमकी कशी आहे याबद्दल इत्यंभूत माहिती असणे गरजेचे असते. लग्नाआधी बऱ्याच गोष्टी समजल्या तर नंतर पश्चाताप करण्याची पाळी येत नाही. आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये मुलापेक्षा मुलीचीच जास्त चौकशी होते.
अर्थात आताच्या आधुनिक युगामध्ये हि गोष्ट बऱ्यापैकी बदलली असली तरी आजही अनेक समाजात लग्न ठरवताना मुलींवर प्रश्नांचा भडीमार केला जातो. मुलीला नीट ओळखून घेण्यासाठी काही प्रश्न विचारणे यात वावगं काही नाही पण काही प्रश्न असतात जे मुलीला विचारणे गरजेचे नसते पण तरी ते विचारले जातात. आज आम्ही तुम्हाला या लेखातून तेच सांगणार आहोत की असे कोणते प्रश्न आहेत जे लग्नाआधी मुलीला विचारू नयेत.
लग्नासाठी तयार आहेस ना? : लग्न हा आयुष्यातला असा एक निर्णय असतो जो प्रत्येकजण दडपणाखाली घेतो. भले तो प्रेम विवाह असो की ठरवून केलेलं लग्न असो, पुढे काय होईल किंवा आपला संसार नेमका कसा असले याबद्दल प्रत्येकाच्या मनात शंका असते. खासकरून मुलींच्या मनात शंकांचं वादळ उठलेलं असतं. कारण त्या आपल्या माणसांना सोडून कायमसाठी दुसऱ्याच्या घरी जाणार असतात. अशावेळी साहजिकच त्या थोड्या तणावात असणे साहजिक आहे. त्यामुळे हा प्रश्न विचारून त्यांना अधिक गोंधळवू नये व त्यांच्या मनावरचं दडपण वाढवू नये.
जेवण बनवता येतं का? : हा प्रश्न काहीसा गरजेचा आहे आणि तितकासा गरजेचा नाही असं सुद्धा म्हणू शकता. हा प्रश्न यासाठी गरजेचा नाही कारण जर तिला जेवण बनवायला येत नसेल तर ती पुढे जाऊन शिकून घेईल. जर एखाद्या मुलीला जेवण बनवता येत नाही याचा अर्थ हा तर नाही की ती चांगली जोडीदार होऊ शकत नाही, ती संसार नीट करू शकत नाही. त्यामुळे हा प्रश्न विचारणे टाळावे. आजकालच्या मुलींना सहसा जेवण बनवायला येत नसते. त्यांना साधे काही पदार्थ येत असतात. पण यावरून मुलगी संसार करू शकत नाही असा समज बनवणे चुकीचे आहे कारण तिला तिच्या करियरमुळे, शिक्षणामुळे घरकाम शिकण्यास वेळ मिळालेला नसू शकतो.
लग्नानंतर वजन कमी करशील ना? : हा प्रश्नच मुळात चुकीचा आहे आणि हा प्रश्न कोणत्याही मुलीच्या मनाला दुखावू शकतो. वजन जास्त असलेल्या कोणत्याही मुलीला तिच्या वजनावरून बोलू नये वा तिला त्याबद्दल प्रश्न विचारू नयेत. तिलाही कळत असते की आपले वजन जास्त आहे पण अशावेळी ती ज्या घरी जाणार आहे तेथील लोकांनीच तिला असे प्रश्न केले तर तिच्या मनात न्यूनगंड निर्माण होऊ शकतो की या लोकांना मी खरंच आवडलेली नाहीये का? हा प्रश्न तिचा लग्नातील उत्साह कमी करू शकतो. तिच्या आनंदावर विरजण पाडू शकतो.
माझ्या आईशी नीट वागशील ना? : होणाऱ्या नवऱ्यामार्फत मुलीला हा प्रश्न सरार्स विचारला जातो. अर्थात त्यामागे त्यालाही काळजी असते हे खरे असले तरी हा प्रश्न विचारण्याऐवजी त्या मुलाने स्वत: ओळखावे की या मुलीचे माझ्या आईशी ट्युनिंग कसे असेल. तरी अनेकदा पहिल्यांदा हा प्रश्न विचारल्यास मुली तो मनावर न घेता, “मी जुळवून घेईन” असे सकारात्मक उत्तर देतात. पण असे सकारात्मक उत्तर मिळून सुद्धा मनात शंका असल्याने अनेक नवरे लग्नाआधी खूप वेळा हा प्रश्न सारखा सारखा विचारतात. त्यांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की त्यांना मुलीबद्दल शंका नसून, शंका त्यांच्या मनातच आहे.
घर सांभाळायला जमेल ना? : कोणतीही मुलगी ही आपल्या घरी लाडातच वाढलेली असते. त्यामुळे तिला घर सांभाळण्याचा वा सगळ्यांचं सगळं करण्याचा अनुभव नसतो. अनेकदा सासूमार्फत हा प्रश्न आपल्या होणाऱ्या सुनेला विचारला जातो. पण सासूने हा प्रश्न विचारण्यापूर्वी लक्षात घेतले पाहिजे की कधी काळी ती सुद्धा एक सूनच होती आणि लग्न झाल्यावर घर सांभाळण्याचा अनुभव तिला आला. त्यामुळे आपल्या होणाऱ्या सुनेला हा प्रश्न विचारणे टाळून उलट तिला धीर द्यावा आणि लग्नानंतर तिला सर्व गोष्टी शिकवाव्यात.